शेतकऱ्यांची थट्टा होत असताना पालकमंत्री झोपलेत का?पीकविम्याच्या मुद्द्यावर भडकल्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर.
MB NEWS(महाराष्ट्रातील बातमीपत्र)अमरावती:- विदर्भातील शेतकऱ्यांची शासनानं थट्टा चालवलीय. पीकविम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. या मुद्द्यावरून विदर्भात अनेक ठिकाणी आंदोलनही सुरू आहे. असं असताना अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील झोपलेत का, असा सवाल तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी केलाय.
गुरुवारी (ता. १६) त्यांनी अमरावती येथे पीकविम्याच्या मुद्द्यावर बोलताना ॲड. ठाकूर म्हणाल्या की, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये शासन भेद करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शासनाने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मस्करी करणं लावलंय. आपण या मुद्द्यावर विधिमंडळात आवाज उठविणार आहोत. त्यासाठी आधीच आपण प्रश्न दाखल केलाय. बीड जिल्ह्यामध्ये पीकविमा कंपनी २४१ कोटी रुपये देत आहे. बीडमध्ये शेतकरी राहतात, मग अमरावती जिल्ह्यात काय जनावरं राहतात काय, असा संतप्त सवालही आमदार अॅड. ठाकूर यांनी केला. अमरावती जिल्ह्यात १० हजार शेतकऱ्यांसाठी फक्त आठ लाख देण्यात आले आहेत, असं त्या म्हणाल्या.
पीकविम्याची ही रक्कम देत असताना अमरावतीचे पालकमंत्री काय झोपा काढतात काय, असं नमूद करीत त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं. शासन शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर अजिबात गंभीर नाही. त्यामुळं आता शेतकरी सत्ताधाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ करणार नाही. शासनानं शेतकऱ्यांना गृहित धरणं बंद न केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरत आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विदर्भातील शेतकरी वेगळा, मराठवाड्यातील वेगळा, पश्चिम महाराष्ट्रातील वेगळा असा भेद आतापर्यंत कुणीही केला नव्हता. परंतु सध्याचं शासन असा भेद करताना दिसतंय, असा आरोपही अॅड. ठाकूर यांनी केला.

