अखेर कांदा कडाडला ! ‘या’ ठिकाणी कांद्याला मिळतोय २४०० रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव, ‘या’ महिन्यात कांदा ४ हजारावर जाणार? पहा…
राज्यात कांदा हे एक मुख्य नगदी पीक आहे. हे पीक पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण सर्वत्र उत्पादित होते. कोकणात विशेषता अलिबागमध्ये पांढऱ्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.अलिबाग पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनासाठी ओळखला जातो आणि येथील पांढऱ्या कांद्याला जीआय टॅग देखील मिळालेला आहे. याव्यतिरिक्त पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली भागही कांदा उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो.
यातील नाशिक जिल्ह्यात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. राज्यातील एकूण कांदा उत्पादनापैकी बहुतांशी कांदा नाशिक जिल्ह्यातच उत्पादित होतो. यामुळे नाशिकला कांद्याचे आगार म्हणून ओळखले जाते. याव्यतिरिक्त विदर्भमधील अमरावती विभागात विशेषता अमरावती जिल्ह्यात उन्हाळी हंगामात गावरान कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
हा गावरान कांदा कायमच भाव खाऊन जातो. दरम्यान उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे गावरान कांद्याच्या उत्पादनात घट आली आहे. अशा परिस्थितीत हा उन्हाळी हंगामातील गावरान कांदा सध्या बाजार समितीमध्ये धुमाकूळ घालत आहे.
गावरान कांद्याला बाजारात 2400 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत आहे. विशेष बाब म्हणजे किरकोळ बाजारात हा कांदा चाळीस रुपये प्रति किलो या दराने विकला जात आहे. यामुळे गावरान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
अमरावती जिल्ह्यात प्रामुख्याने उत्पादित होणारा हा गावरान कांदा मे महिन्यात बाजारात दाखल होतो. यंदा मात्र उन्हाळ्यात अवकाळी पावसाचे थैमान होते. विदर्भातही अवकाळी पावसाने अक्षरशः दानाफान उडवली होती. यामुळे यंदा गावरान कांदा उशिराने बाजारात पोहोचला.

