विदर्भ अवार्ड विनर्स वेलफेअर असोसिएशनने केला योगपटूंचा सत्कार
MB NEWS (अमरावती) :-योग ही भारताने या विश्वाला दिलेली अमूल्य अशी भेट असून योगामुळे कुठलेही अन्य साधन न वापरता शरीर व मन स्वस्थ ठेवले जाऊ शकते . म्हणून प्रत्येकाने रोज एक तास योगासाठी वेळ काढण्याची गरज आहे असे प्रतिपादन योगशिक्षिका डॉ. मेघाताई ठाकरे यांनी केले . विदर्भ अवार्ड विनर्स वेलफेअर असोसिएशनने केलेल्या सत्कार समारंभात त्या आपले विचार व्यक्त करीत होत्या.
याप्रसंगी बोलताना असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष अशोक हांडे म्हणाले की औरंगाबाद जिल्ह्यातील अंबड येथे छत्रपती योग व क्रीडा केंद्राद्वारे आयोजित राज्यस्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेत अमरावतीच्या योगपटूंनी मिळवलेले यश हे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
या सत्कारसोहळ्यात सूर्यनमस्कार स्पर्धेत यशस्वी ठरून सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या अमरावतीच्या योगतज्ञ डॉ. मेघा ठाकरे, डॉ. शीतल धनभर, डॉ. चंदनसिह राजपूत व डॉ. सौ. प्रतिभाताई राजपूत या सर्वांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले गेले व प्रत्येकाने आपले तेथील अनुभव कथन केलेत.
निवृत्त डॉक्टर चंदनसिह राजपूत व सौ.प्रतिभाताई राजपूत यांना मिळालेले सुवर्ण पदक हे विशेष महत्वाचे आहे कारण पतीपत्नी एकाच क्षेत्रात अग्रेसर होत असूनसुध्दा यशस्वी होऊ शकतात आणि योगाच्या अशा संस्कारांमुळे परिवार आरोग्यसंपन्न होतो ही बाब सर्वानी लक्षात घेण्यासारखी आहे असे विचार असोसिएशनचे जिल्हा सचिव चारुदत्त चौधरी यांनी व्यक्त केले.
या सत्कारप्रसंगी असोसिएशनचे कोषाध्यक्ष रामकृष्ण चिखलकर, प्रा सतीश राऊत व विनय काकडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रकाश पुसदकर, प्रेमानंद गडपायले , प्रकाश फाले, माधुरी कावरे या राज्य शासनाच्या गुणवन्त कामगार पुरस्कार प्राप्त सदस्यांनीसुद्धा योगपटूंना शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार चारुदत्त चौधरी यांनी केले.

