धनगर समाजातील विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सुविधा द्यावी; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
MB NEWS (अमरावती): अमरावती येथे जिल्ह्याच्या ठिकाणी धनगर समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या वसतिगृह बांधकामासाठी जागा आणि निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी आग्रही मागणी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे.
यशोमती ठाकूर यांनी लिहिलेल्या पत्रात म्हंटल्याप्रमाणे, अमरावती जिल्ह्यात धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. हे बांधव विकास प्रक्रियेपासून दूर आहेत. त्यामुळे मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची नितांत आवश्यकता आहे. यापूर्वी शासनाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे वसतिगृह उभारण्यासाठी जागा आणि निधी उपलब्ध करुन दिला आहे.
याप्रमाणेच अमरावती येथेही धनगर समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या वसतिगृह बांधकामासाठी जागा आणि निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली. हे वसतिगृह झाल्यास धनगर समाजातील गरजू विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणादरम्यान, येणारी मोठी अडचण दूर होऊ शकेल. तसेच मुलींसाठीही एक वास्तव्याचे सुरक्षित ठिकाण मिळू शकेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

