राज्यात लवकरच पोलिसांची २० हजार पदे भरणार उपमुख्यमंत्र्यांची घोषणा…
MB-NEWS (मुंबई ) :-मागील दोन वर्षापासून कोविड व अन्य कारणांमुळे रखडलेली पोलीस भरती आता राज्य सरकारकडून केली जाणार आहे. राज्यात आता तब्बल २० हजार पोलिसांची पदे भरली जाणार असल्याची माहिती काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: प्रसार माध्यमांना दिली.एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मी घेतलेला आहे. तो म्हणजे दोन वर्षांची पोलीस भरती आता आम्ही हाती घेत आहोत. साधारणपणे पोलिसांची २० हजार पदे भरण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे.” असं फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. याचबरोबर “या संदर्भातील कार्यवाही आम्ही लवकरात लवकर करू. जवळपास साडेसात ते आठ हजार पदांची एक जाहिरात निघालेली आहे. अजून १२ हजार पदांची एक जाहिरात ही लवकरच आम्ही काढणार आहोत. त्यामुळे मोठ्याप्रमाणावर पोलीस भरती आम्ही करणार आहोत. मला असं वाटतं यामुळे पोलीस दलाला निश्चतपणे फायदा होईल.” अशीही माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यभरातील लाखो तरूणांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे. तर या अगोदर राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ ऑगस्ट रोजी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली होती.

