रोहित आणि विराट एकामागून एक झटपट बाद झाल्यावर भारतीय संघाचा डाव आता गडगडणार, असे वाटत होते. पण त्यावेळी भारतीय संघासाठी लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादव धावून आले. या दोघांनी यावेळी कसलीही तमा बाळगली नाही. सुरुवातीपासूनच या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. राहुलने यावेळी दमदार फटकेबाजी करत आपले अर्धशतक साकारले. राहुलचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. गेल्या सामन्यातही राहुलने अर्धशतक झळकावले होते. या सामन्यात राहुलने ३४ चेंडूंत ५५ धावांची दमदार खेळी साकारली, यामध्ये चार चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता.
राहुल बाद झाल्यावर सूर्यकुमारने संघाची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्याला सूर्यकुमारला यावेळी हार्दिक पंड्याची चांगली साथ मिळाली. या दोघांनी गोलंदाजीवर कडक प्रहार केला आणि संघाची धावगती चांगली वाढवली. पण सूर्यकुमार बाद झाला आणि ही जोडी फुटली. सूर्यकुमारचे अर्धशतक यावेळी फक्त चार धावांनी हुकले. सूर्यकुमारने यावेळी दोन चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ४६ धावांची दणदणीत खेळी साकारली. सूर्यकुमार यादव बाद झाल्यावर यावेळी अक्षर पटेलला बढती देण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला. पण हा निर्णय यशस्वी ठरला नाही. कारण अक्षर यावेळी फक्त सहा धावांवर बाद झाला.

